Home / सामाजिक / अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले

अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले

अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले

नांदेड, दि. 28 एप्रिल :- महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापासून नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी होऊ घातलेले एकूण 11 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

चाईल्ड लाईन 1098 ही राष्ट्रीय आपत्कालीन सेवा 24 तास कार्यरत असून, बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यात येते. 19 एप्रिलपासून अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी बालविवाह होत असल्याच्या तक्रारी 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाल्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून थेट घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईदरम्यान संबंधित वधू-वरांचे वय तपासून बालविवाह थांबविण्यात आले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळले. देगलूर तालुक्यातील 1, नायगाव तालुक्यातील 2, लोहा तालुक्यातील 3, नांदेड तालुक्यातील 3, भोकर तालुक्यातील 1 व मुखेड तालुक्यातील 1 असे एकूण 11 बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार विवाहासाठी मुलाचे किमान वय 21 वर्षे व मुलीचे 18 वर्षे असणे आवश्यक आहे. या संदर्भात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर ग्रामपंचायत अधिकारी व अंगणवाडी सेविका यांची भूमिका बालविवाह प्रतिबंधासाठी महत्त्वाची ठरत आहे.

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *