Home / राजकारण / सत्तर वर्षे महापालिकेच्या जागा बीओटी तत्वावर विकले त्यांनी शिकाऊ नये

सत्तर वर्षे महापालिकेच्या जागा बीओटी तत्वावर विकले त्यांनी शिकाऊ नये

नांदेड – काही नेत्यांच्या एकाधिकारशाहीमुळे नांदेड शहराचा विकास खुंटला आहे. नांदेड शहर ऐतिहासिक शहर आहे मात्र दुर्दैवाने या शहराच्या विकासाकडे सर्वच राजकारण्यांचे दुर्लक्ष झाले. शहराच्या विकासाचे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. महापालिकेच्या मोक्यावरील जागा बीओटी तत्वावर विकले त्यांनी शिकाऊ नये असा टोला आमदार हेमंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता लगावला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास विभागप्रमुख एकनाथ शिंदे यांनी नांदेड शहरासाठी प्राधिकरण स्थापन करण्यास सकारात्मकतादर्शविली आहे. या अनुषंगाने मुंबई येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीच्या अनुषंगाने आमदार हेमंत पाटील यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. पुढे बोलताना हेमंत पाटील म्हणाले, नांदेड महापालिका अस्तित्वात आल्यानंतर ज्या काही मोक्याच्या जागा होत्या त्या विकासकाला विकण्यात आल्या. नांदेड पालिकेचे तत्कालिन प्रशासक कै. शांताराम सगणे यांनी नांदेडच्या विकासासाठी तथा नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी स्टेडियम उभारणीदरम्यान तेथे अनेक गाळे बांधले. शिवाजीनगर येथे जनता मार्केट निर्माण करून व्यापारी संकुल निर्माण केले. यातून तत्कालिन काळात बरेच उत्पन्न मिळाले. परंतु नांदेड शहरावर ज्यांनी ७० वर्षांपासून राज्य गाजवले त्याच नेत्यांनी आता नांदेड शहर विकायला काढले आहे. महापालिका मालकीच्या अनेक जागा खासगी विकासकालादिल्या यावरून स्पष्ट होत आहे. आजघडीला नांदेड शहरालगतच्या ५ कि. मी. परिघात टोलेजंग इमारती बांधण्याचे पेव फुटले आहे. या भागात कुठलीही मोकळी जागा, गार्डन दिसत नाही. पार्किंगची व्यवस्था नाही. परिसरासाठी आरक्षित जागा सोडण्यात येत नाही, ही गंभीर बाब आहे. यामुळे पुढील २५ वर्षाच्या काळात नांदेडच्या विकासाचे व्हीजन डोळ्यासमोर ठेवून काम होणे गरजेचे आहे. नांदेड शहरालगतच्या २० कि. मी. परिघात विकास झाला पाहिजे. यासाठी प्राधिकरणाची स्थापना होणे गरजेचे आहे. विकासाचा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मुंबई येथे बैठक घेण्यात आली. काहींनी प्राधिकरणाला समर्थन दिले तर काहींचा विरोध कायम आहे, असे सांगत अप्रत्यक्षरित्या खा. अशोकराव चव्हाण यांच्यावर आ. पाटील यांनी टीका केली. यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, नांदेड महापालिका म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, ती आपल्याच ताब्यात राहावी, असे काहींना वाटत आहे. परंतु नांदेडच्या विकासासाठी राजकीय, आर्थिक हितसंबंध दूर ठेवून केवळ नांदेडकर म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे, असेही आ. हेमंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *