विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने राजकीय तडजोडीपोटी आमदार प्रतापराव चिखलीकर यांना भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये जावे लागले. ही वस्तुस्थिती असून पुढील काळात ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सुतोवाच नांदेड महानगर भाजपचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते असून राष्ट्रवादीमधील माझा प्रवेश ही केवळ पॉलिटीकल अॅडजेंस्टमेंट होती, असे विधान आमदार चिखलीकर यांनी नुकतेच केले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना अमरनाथ राजूरकर म्हणाले, स्वीकारार्हता राजकीय सीमांच्या पलीकडे आहे. आमदार चिखलीकर यांनी सर्वच प्रमुख पक्षांचा प्रवास केला आहे. पाच वर्षे ते भाजपातही होते. त्या काळात फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल आपुलकी निर्माण होणे स्वाभाविक आहे. आमदार चिखलीकरांच्या विधानांचा गर्भीत अर्थ लक्षात घेता ते पुन्हा भाजपात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील निवडणुकीत लोहा मतदारसंघ भाजपला मिळू शकेल, त्यानंतर ते पुन्हा भाजपचे लोकप्रतिनिधीमधून कार्यरत असतील. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील मंडळीही पुन्हा भाजपात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.