नांदेड (प्रतिनिधी) दीर्घ वाचण्यासाठी कुणाकडेही वेळ नसलेल्या आजच्या काळात रोहिणी पांडे यांच्या ‘तिच्या खिडकीतलं आभाळ’ या कथासंग्रहातील लघुकथा वाचकांना अत्यंत जवळच्या वाटतात. आभाळातील ब्रह्मांड या लेखिकेला खुणावत असून स्त्रीचे आत्मभान येथे जागृत होत आहे. आभाळ, गोड चाहूल, कळीचे फूल होतांना, पसायदान इत्यादी कथा म्हणजे स्त्रीचं वेदनादायी जगणं सांगून जातात. एकूणच रोहिणी पांडे यांच्या कथा म्हणजे खिडकीतील आभाळातील मानवी नात्यांचा अन्वय लावणारी अभिवृत्ती होय, असे प्रतिपादन साहित्यिक देवीदास फुलारी यांनी केले.
ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तिच्या खिडकीतलं आभाळ’ या कथासंग्रहावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर कोषागार अधिकारी तथा साहित्यिक निळकंठ पाचंगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आशा पैठणे आणि लेखक धनंजय गुडसुरकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी इबीतदार यांनी केले. रोहिणी पांडे यांनी आपल्या मनोगतात आपल्या लेखनाच्या प्रेरणा सांगतांना दैनंदिन जीवनातील येणारे अनुभव विशद केले. प्रकाशन सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार राम तरटे यांनी केले. आभार प्रदर्शन कवी श्रीनिवास मस्के यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना लेखक धनंजय गुडसूरकर म्हणाले की, ‘आभाळ भरून येतं तेव्हा पाऊस पडतोच असे नाही, मन भरून येतं तेव्हा शब्द बाहेर पडावेत हा नियम नाही. त्यासाठी लागणारं द्रष्टं मन आणि शब्दसामर्थ्य हे ‘तिच्या खिडकीतलं आभाळ’चं बलस्थान आहे. कला ही कलावंताची निर्मिती असली तर कलेवर समाजाचा हक्क असतो. सामान्याच्या जगण्याला आकार देण्याची ताकद कलेत असते. साहित्य त्याला अपवाद असण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना निळकंठ पाचंगे म्हणाले की, एक संवेदनशील लेखिका म्हणून रोहिणी पांडे यांनी बाईच्या चार भिंतीच्या घुसमटीचा घेतलेला धांडोळा म्हणजे ‘तिच्या खिडकीतलं आभाळ’ आहे. साहित्य मंडळाचे सदस्य लेखक, कवी देविदास फुलारी हे साहित्य परिषदेच्या माध्यमातून नवोदित कंवी-लेखकांचे कायम प्रेरणास्थान आहेत आणि त्यांना लिहावयास लावणे मदत करणे त्यामुळे नवीन लेखक पुढे येत आहेत.
कवयित्री, गझलकारासोबत लेखिका म्हणून रोहिणी पांडेंच्या पहिल्या कथासंग्रहाचे आपण स्वागत करूया.
आशा पैठणे यांनी ‘तिच्या खिडकीतलं आभाळ’ या कथासंग्रहातील स्त्रीवादी कथांवर प्रामुख्याने प्रकाश टाकला.
या प्रकाशन सोहळ्याला मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. जगदीश कदम, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, संपादक शंतनू डोईफोडे, ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम, लोकसंवाद साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. महेश मोरे, अमृत तेलंग, शिवा जोगदंड, शिवा कांबळे, कॉ. जामकर, निशा डांगे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सारिका बकवाड, अनुजा डोईफोडे, डॉ. स्वाती भद्रे, प्रा. अनुराधा पत्की, प्रा. स्वाती कान्हेगावकर, अरुंधती जोशी, रूपाली वागरे, प्रा. किनगावकर, कल्याण पांडे, संजीवनी पांडे, अलका पांडे, मुकुंद पांडे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी यावेळी उपस्थिती होती.
– विजय निलंगेकर