नांदेड – नांदेड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे व अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. उन्हाळी शेती पिके, केळी, आंबा व इतर फळबागा या नैसर्गिक आपत्तीत भुईसपाट झाल्या आहेत. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात नुकसानीचे प्रमाण प्रचंड दिसून येत आहे. गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेली,
घरांचेही प्रचंड नुकसान झाले. शिवाय विजा कोसळून शेतकऱ्यांची जनावरे दगावली.वारंवार होणाऱ्या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पार खचून गेला असून शेतकऱ्याला तातडीच्या आर्थिक मदतीची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे प्रशासकीय पातळीवर तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी विनंती खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
